राज्यात पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे पावसाला प्रसन्न करण्यासाठी गाढवांचे लग्न लावून वरुणाकडे प्रार्थना करण्याचा एक अनोखा पारंपरिक प्रकार विजापूरमध्ये पाहायला मिळाला.

जून महिना संपत आला तरी विजापूर जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असून पेरण्या खोळंबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विजापूरमधील अडकीगल्ली येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत दोन गाढवांचा शास्त्रोक्त पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला. ग्रामीण भागात गाढवांचे लग्न लावल्यास पाऊस पडतो अशी दृढ श्रद्धा आहे. विशेष म्हणजे हा विवाह पार पडताच या भागात पाऊस झाला.

या विवाह सोहळ्यासाठी गाढवांना बाशिंग बांधून वधू-वराप्रमाणे सजवण्यात आले होते. मंत्रोच्चारांच्या गजरात विवाह पार पडल्यानंतर उपस्थितांनी अक्षता टाकून पावसासाठी प्रार्थना केली. लग्नानंतर वाजतगाजत गाढवांची मिरवणूक काढण्यात आली आणि महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. जुन्या परंपरेनुसार गाढवांच्या ओरडण्याचा आवाज वरुणापर्यंत पोहोचावा या उद्देशाने शेतकरी आजही ही परंपरा पाळत आहेत. एकूणच पावसासाठी शेतकरी वर्ग विविध धार्मिक आणि पारंपरिक मार्गांनी प्रार्थना करत असून आगामी काळात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विजयकुमार सारवाड, इन न्यूज विजापूर


Recent Comments