महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच घटप्रभा परिसरातील मुसळधार पावसामुळे विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी जलाशयातून लालबहादूर शास्त्री सागरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
सोमवारी संध्याकाळपासून जलाशयाच्या २६ क्रस्ट गेट्समधून १,२५,००० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. गेल्या 20 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अचानकपणे हजेरी लावल्याने कृष्णा नदीला पुन्हा पूर येण्याचे संकेत दिसत आहेत.
सोमवारी सकाळी १६ गेटमधून पाणी सोडले जात होते. मात्र काल संध्याकाळपासून पाण्याचा जोर वाढल्याने २६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी जलाशयात ७७ हजार क्युसेकची आवक होती तर आज सकाळी पाण्याची पातळी ९४,३०४ क्युसेकच्या पुढे गेली आहे.
कल्लोळ बॅरेजजवळून कृष्णेच्या प्रवाहातून ६२ हजार ५०० क्युसेक, तर घटप्रभा नदीतून ५२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. लाल बहादूर शास्त्री सागरमध्ये ६ ते १० टीएमसी इतकी वाढ पाणीपातळीत झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, इनलेटऐवजी आउटलेटवर पाणी वाढवले जात असून सध्या ५१९.६० मीटर उंच जलाशयात ५१९.५४ मीटर इतका पाणीसाठा आहे.
कृष्णा नदीत पाण्याची होणारी आवक लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरस्थिती टाळण्यासाठी जलाशयातील गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालिकोटी परिसरात कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे मोठे नुकसान झाले आहे.


Recent Comments