विजापूर जिल्ह्यात यंदा मान्सून लांबल्यामुळे शेतकरी चिंतेत असून, उत्तम पावसासाठी आणि बळीराजाच्या सुखासाठी व्यंकटेश्वर मंदिरात विशेष होम-हवन आणि वैदिक पद्धतीनुसार ‘इंद्रयाग’ सोहळा श्रद्धेने पार पडला.


वैदिक परंपरेत पाऊस आणि समृद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी विजापूर येथील व्यंकटेश्वर मंदिरात या विशेष यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. भरणी, रोहिणी आणि मृगशीर्ष ही नक्षत्रे कोरडी गेल्याने जिल्ह्यातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निसर्गाची अवकृपा दूर व्हावी, म्हणून शेकडो शेतकऱ्यांनी या पूजेत सहभागी होऊन पावसासाठी साकडे घातले.


या धार्मिक विधी दरम्यान व्यंकटेश्वर स्वामींना दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आला, तसेच गोपूजा आणि महाआरतीही पार पडली. देशातील कृषी व्यवस्था सुभिक्ष व्हावी आणि शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, असा संकल्प या यज्ञात करण्यात आला. यापूर्वी २००६ मध्ये या मंदिरात असाच इंद्रयाग करण्यात आला होता आणि त्यानंतर उत्तम पाऊस झाला होता, अशी आठवण आयोजकांनी यावेळी सांगितली. निसर्गाच्या चक्रापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी हा यज्ञ केल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी दिली.


Recent Comments