एससीपी-टीएसपी योजनेच्या निधीचा अन्य कारणांसाठी गैरवापर होत असल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी ३ जुलै रोजी बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे भव्य दलित जनआक्रोश अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

दलित संघर्ष समितीचे (आंबेडकरवादी) विभाग संयोजक संजू कंबागी यांनी ही माहिती दिली. बेळगाव येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत संजू कंबागी यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला. दलितांच्या कल्याणासाठी राखीव असलेला २०० कोटी रुपयांचा निधी केएसआरटीसी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वापरण्यात आल्याचा दावा करत हा निधी त्वरित परत करावा आणि गैरव्यवहार करणाऱ्या वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

बॅकलॉग पदांची त्वरित भरती आणि भूमिहीन व घरकुल नसलेल्या दलित कुटुंबांना सुविधा देण्यासह एकूण १९ मागण्यांसाठी हे अधिवेशन होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. या अधिवेशनात राज्यभरातून ५० हजारांहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असून, मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या पत्रकार परिषदेला महांतेश तळवार, नागेश कामशेट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments