हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे विभाजन करून धारवाडसाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी जिल्हा पालकमंत्री संतोष लाड यांच्या नेतृत्वाखाली धारवाडमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

शहरातील सर्किट हाऊसमध्ये धारवाड स्वतंत्र महानगरपालिका कृती समितीच्या आंदोलकांसोबत जिल्हा पालकमंत्री संतोष लाड यांनी सविस्तर चर्चा केली. धारवाडसाठी स्वतंत्र महापालिका देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी आंदोलकांना दिली.

या बैठकीत बोलताना माजी सभापती वीरण्णा मत्तिकट्टी यांनी सांगितले की, राज्य सरकारने स्वतंत्र महानगरपालिकेसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, राज्यपालांकडून या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास होणारा विलंब योग्य नाही. राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवून या निर्णयाला विरोध करणे चुकीचे आहे. स्वतंत्र पालिकेमुळे हुबळी शहराला कोणताही त्रास होणार नाही, उलट धारवाड शहराच्या विकासासाठी ही अत्यंत आवश्यक बाब आहे. जर राज्यपालांनी स्वाक्षरी करण्यास असाच विलंब लावला, तर आम्हाला धारवाड बंद पुकारून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला.


Recent Comments