कागवाडमध्ये भगवान महावीर जयंती अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित भव्य शोभायात्रा, धार्मिक विधी आणि प्रवचन अशा विविध कार्यक्रमांना जैन बांधवांनी मोठी उपस्थिती लावली होती.

यावेळी आचार्य शीतलसागरजी मुनी महाराज यांनी निरूपण केले . ते म्हणाले, भगवान महावीरांनी मानवजातीला अहिंसा, सत्य आणि त्यागाचा शाश्वत संदेश दिला असून त्यांचे विचार आजही जगाला दिशा देणारे आहेत.
याबाबत अॅड. तात्यासाहेब धोतरे यांनी माहिती देताना सांगितले कि, कागवाड जैन समाज संघटनेच्या वतीने स्थानिक महावीर जैन मंदिरात यानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मंदिरातून ढोल-ताशांच्या गजरात भगवान महावीरांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महावीरांच्या मूर्तीला शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत अभिषेक घालण्यात आला. तसेच या मंदिर उभारणीसाठी भरघोस मदत केलेल्या सर्व देणगीदारांची मुनी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रशासकीय स्तरावरही तहसीलदार कार्यालय आणि तालुका पंचायत कार्यालयात महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार रवींद्र हादीमनी, उपतहसीलदार विजय चौगुले आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भगवान महावीर प्रतिमा पूजन पार पडले. याप्रसंगी अॅड. तात्यासाहेब धोतरे, दिलीप कवटगे, बाळू कवटगे यांच्यासह कागवाड तालुक्यासह उगार बुद्रुक, ऐनापुर , उगार खुर्द, शिरगुप्पी, मोळे, जुगुळ, शेडबाळ आणि मंगसुळी येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments