Chikkodi

जागतिक युद्ध रोखण्यासाठी भारताने मध्यस्थी करावी; श्रीशैल जगद्गुरूंचे आवाहन

Share

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला युद्धाचा भडका उडण्यापूर्वीच भारताने यात मध्यस्थी करून हे युद्ध थांबवावे, अशी आग्रही विनंती श्रीशैल जगद्गुरू चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजींनी केली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील येडूर येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत स्वामीजींनी हे महत्त्वपूर्ण विधान केले. इराक, इराण, इस्रायल आणि आखाती देशांमध्ये सध्या युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. अशी युद्धे मानवासाठी घातक असून ती थांबवण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, असे मत श्रीशैल जगद्गुरू चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजींनी व्यक्त केले. भारताने प्राचीन काळापासून जगाला शांततेचा संदेश दिला आहे, त्यामुळे हे युद्ध थांबवण्याचे प्रयत्न भारताने केल्यास जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा अधिक उंचावेल, असेही स्वामीजींनी नमूद केले.

याच वेळी स्वामीजींनी देशांतर्गत विषयावरही भाष्य केले. देशात आता ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची वेळ आली असून, उपराष्ट्रपतींनी या दिशेने लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी विनंती श्रीशैल जगद्गुरू चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजींनी केली.

Tags: