Dharwad

कमलापूर स्मशानभूमीचा वाद संपुष्टात; जमीनमालकाकडून कोट्यवधींची जमीन दान

Share

धारवाडमध्ये चर्चेत असलेल्या स्मशानभूमी प्रकरणाचा अखेर सुखद शेवट झाला आहे. भू-मालक आणि स्थानिक नागरिकांमधील वादाने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढवली होती, मात्र भू-मालकाच्या त्यागवृत्तीमुळे आता कमलापूरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

धारवाड शहरातील कमलापूर वस्तीजवळ स्मशानभूमी असून, येथे ४ एकर १५ गुंठे जमीन आहे. कमलापूरसह इतर चार वस्त्यांमधील लोक गेल्या अनेक वर्षांपासून याच जमिनीवर अंत्यसंस्कार करत आले आहेत. ही जमीन सध्या मल्लिकार्जुनय्या हिरेमठ यांच्या नावावर असल्याने, ती विकली जाण्याची भीती निर्माण झाली होती. यामुळे अंत्यसंस्कारासाठी जागाच उरणार नाही या भीतीने नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते, तसेच “कोणीही ही जमीन खरेदी करू नका” असा इशाराही देणारा फलक लावला होता.

यावर तोडगा काढण्यासाठी भू-मालक, स्थानिक नागरिक आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत “मी १ एकर १५ गुंठे जमीन स्मशानभूमीसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे सांगत भू-मालक मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी आपल्या निर्णयावर भाष्य केले. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून निर्माण झालेला तिढा अखेर संपुष्टात आला आहे.

सध्या या परिसरात जमिनीचे दर प्रति एकर किमान ३ कोटी रुपये असतानाही, भू-मालक मल्लिकार्जुन यांनी जनतेच्या दबावाला मान देऊन काही भाग महानगरपालिकेला दान केला. त्यांनी स्वतः तहसीलदारांना जमिन हस्तांतरणाची पुढील प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली असून सदर प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. अनेक दिवसांपासून प्रशासनाची डोकेदुखी ठरलेले हे प्रकरण इतक्या सहजपणे सुटल्याने तहसीलदार दुंडप्पा हूगार यांनी भू-मालकाचे आभार मानले.

या भागात अंत्यसंस्कारासाठी मोठी समस्या होती. पण आता कोट्यवधी रुपये किमतीची जमीन दान करणे, ही एक आश्चर्यकारक बाब आहे. विशेष म्हणजे, रस्त्यालगतची मोक्याची जागा त्यांनी सार्वजनिक वापरासाठी दान केली आहे, यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकूणच, अनेक दिवसांपासून कठीण झालेले हे प्रकरण सोप्या पद्धतीने संपले असून, स्थानिक नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Tags: