Raibag

रायबागमध्ये अंत्यसंस्कारादरम्यान प्राणघातक हल्ला

Share

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग शहरात अंत्यसंस्कारादरम्यान झालेल्या वादाला हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांवरच त्यांच्या जावयाने आणि साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

संतोष भोसले नावाच्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय अंत्यसंस्काराच्या विधींमध्ये व्यस्त होते. याच दरम्यान बेळगावमधील जावई अभिषेक रवी माने, नंदू रवी माने, इचलकरंजीमधील आकाश माने, ओंकार भिषे यांच्यासह काही महिला आणि इतर साथीदारांनी मृताच्या नातेवाइकांवर प्राणघातक हल्ला केला. हा वाद इतका वाढला की संशयितांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये काही जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

हल्ल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, जखमींना उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अंत्यसंस्कारासारख्या गंभीर प्रसंगी झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे रायबाग शहरात मोठी खळबळ उडाली असून, संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Tags: