Dharwad

केंद्रातील भाजप सरकारविरोधात मंत्री संतोष लाड आक्रमक

Share

नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून धारवाडमध्ये कामगार मंत्री संतोष लाಡ यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र सरकारमध्ये सध्या विचारणारे कोणीही उरले नसून, देशात काहीही गळती झाली तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष लाड यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “केंद्राला जाब विचारणारे कोणीही नाही, त्यामुळे तिथे काहीही लीक झाले तरी चालते,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. गेल्या काही वर्षांतील निवडणूक प्रक्रियेवर भाष्य करताना त्यांनी पश्चिम बंगालमधील २७ लाख मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा दावा केला. “देशातील १३ कोटी जनतेला टार्गेट करण्यात आले असून विविध राज्यांत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले आहेत,” असा खळबळजनक आरोप संतोष लाड यांनी केला.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. “एकीकडे देशाला आर्थिक महासत्ता म्हणायचे आणि दुसरीकडे गरिबांना सोने खरेदी करू नका असे सांगायचे, हा विरोधाभास आहे. अदानींच्या लग्नात जाऊन नाचणारे पंतप्रधान मध्यमवर्गीयांना मात्र साधेपणाने लग्ने करण्याचा सल्ला देतात,” अशी टीका संतोष लाड यांनी केली. अदानी आणि अंबानी यांच्या व्यवसायातील नफा हा त्यांच्या संशोधनातून आलेला नसून तो केवळ मोदींच्या आशीर्वादामुळे मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

पेपरफुटीच्या घटनांबाबत बोलताना ते म्हणाले की, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पेपरफुटीच्या अनेक घटना घडल्या, मात्र त्यावर कोणतीही चर्चा होत नाही. याउलट, काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये एखादी छोटी घटना घडली तरी त्याचे मोठे भांडवल केले जाते. केंद्राच्या अपयशावर चर्चा करण्याऐवजी केवळ भाषणांवर भर दिला जात असल्याची टीका संतोष लाड यांनी केली.

Tags: