धारवाडमधील विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मानसिक छळामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी धारवाडमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली.

समान विचारवंत मंचच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. अमली पदार्थ चाचणीत आदित्य म्यागेरी (२०) या विद्यार्थ्याचा अहवाल नकारात्मक येऊनही, पोलिसांनी मध्यस्थांमार्फत दोन हजार रुपयांची मागणी केली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून किटेल कॉलेजच्या या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले. वडिलांचे छत्र हरपलेल्या या एकुलत्या एक मुलाचा पोलिसांनी बळी घेतल्याचा आरोप करत, आंदोलकांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाचा निषेध केला.

या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय व भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


Recent Comments