Belagavi

बेळगावात तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Share

बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एक तरुण गंभीर जखमी झाला असून, या पार्श्वभूमीवर पुढील सोमवारपासून स्थानिक रहिवाशांनी सामूहिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या रस्त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त आहे. बेळगावातील तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. नुकताच एक तरुण दुचाकीवरून प्रवास करत असताना अपघात होऊन गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.

प्रसाद नावाचा हा तरुण कुटुंबातील कमावता व्यक्ती आहे. तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या खराब रस्त्यामुळे त्याची दुचाकी घसरली आणि तो रुग्णालयात पोहोचला. सामान्य लोकांसाठी हा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ बनला असून, तो तात्काळ विकसित करण्याची मागणी त्याने केली आहे.

या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षी धोरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी गणेशोत्सवादरम्यान दोन दिवसांत रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते फसले आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाही, की कोणत्या राजकीय दबावामुळे हा रस्ता तयार होत नाही, हे माहिती नाही. पण सामान्य नागरिकांची अवस्था पाहून रस्त्याचे काम तातडीने करावे. अन्यथा, पुढील सोमवारपासून उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

आता तरी संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जागे होऊन रस्ता बांधायला सुरुवात करतात का, हे पाहावे लागणार आहे.

Tags: