Vijayapura

मंत्रीपद न मिळाल्यास आक्रमक भूमिका घेणार : आम. यशवंतरायगौडा पाटील

Share

मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात मंत्रीपद न मिळाल्यास अधिक आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा इंडी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठांना दिला आहे.

विजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी काळात पक्षात डावलले गेल्यास शांत बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी झालेल्या बैठकीत आपल्याला मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा आमदार पाटील यांनी केला आहे. राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत हा शब्द देण्यात आला होता, असे सांगत आता ती आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्षांतर्गत सत्ता वाटपाचा भाग म्हणून डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर संधी नाकारलेल्या ज्येष्ठ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊन न्याय दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पहिल्या टप्प्यातच मंत्रीपद मिळणे अपेक्षित होते, परंतु ते शक्य झाले नाही. आता विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपला विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इंडी विधानसभा मतदारसंघाला गेल्या ऐंशी वर्षांत एकदाही मंत्रीपद मिळालेले नाही, ज्यामुळे मतदारसंघातील जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. काँग्रेसला मतदान न करणारे नागरिकही मतदारसंघाला मंत्रीपद का मिळत नाही, असा जाब विचारत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर कर्नाटक आणि विजापूर जिल्ह्यामध्ये नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी पक्षाने आपल्याला संधी द्यावी आणि नेते आपला शब्द पाळतील, असा विश्वास आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी व्यक्त केला.

Tags: