धारवाड जिल्ह्यातील अन्नीगेरी तालुक्यातील गुट्टीगनूर गावाजवळ भाताचा पेंढा (गवत) घेऊन जाणाऱ्या लॉरीला अचानक आग लागली. वीजभारीत तारेचा स्पर्श झाल्याने लागलेल्या या आगीत संपूर्ण लॉरी जळून खाक झाली.
बागलकोटहून गुट्टीगनूर गावात येत असताना रस्त्यातील वीजवाहक तारेचा लॉरीच्या हौद्यातील गवताळ स्पर्श झाला. त्यामुळे लॉरीच्या वरच्या गवताने पेट घेतला. हा प्रकार लॉरी चालकाच्या लक्षात आला आणि त्याने तत्काळ गुट्टीगनूर गावाबाहेर लॉरी आणून थांबवली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांची मदत घेत अग्निशमन दलाला माहिती दिली.
तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने आग विझवण्यात यश मिळविले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. आग विझवल्यानंतर अन्नीगेरी पोलीस आणि गुट्टीगनूर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गावाच्या शिवारात मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची वर्दळ होती. आग गावात पसरेल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. पण वेळीच ही आग विझवल्याने शेतकऱ्यांची भीती दूर झाली.


Recent Comments