Vijayapura

विजापुरात दोन मुलींसह मातेची कालव्यात उडी घेऊन आत्महत्या

Share

कौटुंबिक वादातून आईने आपल्या दोन मुलींसह कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील उक्कली गावात घडली.

गावाबाहेरील मुळवाड उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यात उडी मारून महिलेने आत्महत्या केली. तिने आपल्या दोन कोवळ्या मुलींसह ओसंडून वाहणाऱ्या कालव्यात उडी घेतली. रेणुका अमीनप्पा कोनिन (२६), यल्लवा (२) अमृता (१) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. दोनच दिवसांपूर्वी पतीच्या घरी भांडण होऊन रेणुका आपल्या दोन मुलींसह घरातून निघून गेली होती.

पतीचे कुटुंबीय दोन दिवसांपासून रेणुका आणि मुलांचा शोध घेत होते. अखेर काल त्यांनी मनगुळी पोलीस ठाण्यात रेणुका मुलींसह बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. आज कालव्यात रेणुका आणि एका मुलीचे मृतदेह सापडले. स्थानिक आणि पोलीस अजून एका मुलीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. मनगुळी पोलीस ठाण्याचे पीएसआय परशुराम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी मनगुळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Tags: