साखर आयुक्तालयाचे स्थलांतर बेळगावात करावे, ऊसबिलाची बाकी रक्कम तातडीने द्यावी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी शनिवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेने यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी साखर आयुक्तालयाचे स्थलांतर बेळगावात करावे, ऊसबिलाची बाकी रक्कम तातडीने द्यावी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात अशा मागण्या केल्या. निदर्शकांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना एका शेतकरी नेत्याने सांगितले की, सरकारने यापूर्वी साखर आयुक्तालयाचे बेळगावात स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्याप पूर्ण केलेले नाही. अतिवृष्टीने घरे पडलेल्या विस्थापितांना भरपाई देण्यात आणि उसाची शिल्लक बिले कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे भरपाई आणि बाकी ऊस बिले तातडीने देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज आणि उद्या बेळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. आता त्यांच्या मागण्यांना मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात हे पहावे लागेल.


Recent Comments