ग्रामीण भागात ‘कोरोनामुक्त गाव‘ संकल्पना साकार करण्यासाठी सर्व तयारी केल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी दिली.

बेळगावात शुक्रवारी रुपाली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भारतीय जैन संघटनेच्या वतीने ‘कोविडमुक्त भारत’ कार्यक्रम घेण्यात आला. माजी आ. संजय पाटील यांनी त्याचे उदघाटन केले. यावेळी बोलताना शांतीलाल मुथा म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत सगळ्यांना घाम फुटला होता. सगळेजण घरी बसून राहिले होते. डॉक्टरही सेवा देण्यास कचरत होते. त्यावेळी आमच्या संघटनेने मोबाईल हेल्थ क्लीनिक सुरु करून शहरातील लोकांची आरोग्य तपासणी केली. त्याचप्रमाणे दुसऱ्या लाटेत अँटीजेन टेस्ट करवून कोरोना रुग्णांचा शोध लावला. सध्या मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या सहयोगाने धारावी झोपडपट्टीत कोरोनाविरोधात अभियान उघडले आहे.
नुकताच कर्नाटक सरकारशीही करार करून कर्नाटकातही तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सर्व तयारी केली आहे. त्यानुसार बेळगावात आमच्या संघटनेतर्फे कोरोनामुक्त ग्राम निर्माण करण्यासाठी काम सुरु केले आहे. सर्वानी एकत्रितपणे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करू असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, राष्ट्रीय सरचिटणीस गौतम बाफना, राज्य अध्यक्ष महावीरचंद पारेख, माजी आ. कल्लाप्पा मग्गेन्नावर, प्रभारी दिनेश पायरेचा, उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर, बेळगाव विभागाध्यक्ष विनोद दोड्डण्णावर, सचिव श्रीपाल खेमलापुरे, हिराचंद कलमनी आदी उपस्थित होते.


Recent Comments