Vijayapura

विजापूर: धोकादायक विद्युत तार दुरुस्तीसाठी भाजपची मागणी

Share

विजापूर शहरात मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत विद्युत तारेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेला वर्ष उलटूनही शहरातील धोकादायक विद्युत तारांची दुरुस्ती न झाल्याने भाजप नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मागील वर्षी विजापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका तरुणाचा विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शहरातील विविध भागात असलेल्या धोकादायक विद्युत तारांची अद्याप योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्यात आलेली नाही. याबाबत भाजप नेत्यांनी चिंता व्यक्त करत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

गेल्या वर्षी दोन सप्टेंबर रोजी ढोबळे गल्लीतील गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक गांधी चौकातून जात असताना शुभम शिवाजी संकपाळ या तरुणाचा तारेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या घटनेला आता जवळपास एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरीही गांधी चौक ते सराफ बाजार रस्त्यावरील आणि इतर परिसरातील तारांची प्रशासनाकडून दुरुस्ती झालेली नाही.

येत्या काळात गणेशोत्सव जवळ आला असून पुन्हा असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलावीत. शहरातील सर्व धोकादायक तारा त्वरित दुरुस्त कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. आगामी काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी दिली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष परशुराम रजपूत, भाजप शहर मंडळ अध्यक्ष संदीप पाटील झळकी आणि सिद्धेश्वर बँकेचे संचालक ईरण्णा पट्टणशेट्टी यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Tags: