विजापूरचे भाजप आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांनी काँग्रेस मंत्री जमीर अहमद खान यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जमीर अहमद यांनी राष्ट्रगीत आणि वंदे मातरम्चा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी मंत्री जमीर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पत्रकारांशी बोलताना यत्नाळ म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि मंत्री असूनही जमीर अहमद यांनी ध्वजारोहण आणि वंदे मातरम्चा योग्य तो मान राखला नाही. त्यांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेतृत्वाला जर देश, संविधान आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदर असेल, तर त्यांनी जमीर अहमद यांची तात्काळ मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी. राष्ट्रभावना आणि संविधानाचा अनादर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायमस्वरूपी निवडणूक लढवण्यास बंदी घालणारा कायदा करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
या वेळी यत्नाळ यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही खरमरीत टीका केली. काँग्रेसने नेहमीच संविधानाचा आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा अनादर केला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली आहे, असा दावा त्यांनी केला.


Recent Comments