शेतकऱ्यांनी पांढऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन बेळगाव जिल्ह्याचे सह कृषी संचालक एच. डी. कोळेकर यांनी केले.


हुक्केरी तालुक्यातील कृषी विभाग, कृषी शास्त्रज्ञ, आत्मा योजना आणि कृषी संजीवनी यांच्या वतीने आयोजित पांढऱ्या अळीच्या व्यवस्थापनाबाबतच्या शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले.

शेतकऱ्यांना संबोधित करताना कोळेकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकरी संपर्क केंद्रात कुशल कृषी अधिकारी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी करण्यापूर्वी या अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती घेऊनच पेरणी करावी.
कृषी संशोधक डॉ. सुनीलकुमार नूली यांनी शेती पद्धती, रासायनिक खतांचा संतुलित वापर, तण व्यवस्थापन आणि विविध रोगांवरील उपाययोजनांविषयी माहिती दिली.
या व्यासपीठावर श्री निजंलिंगप्पा साखर कारखान्याचे प्रमुख डॉ. राजगोपाल, डॉ. धनंजय चौगुला, प्रकाश पाटील, समीर लोकापुरे, डी. सी. अलकनूर, शिवानंद कमते उपस्थित होते.
हुक्केरी कृषी विभागाचे सहाय्यक संचालक महादेव पटगुंदी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, जिल्ह्यातील विविध कृषी संशोधक, शास्त्रज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याबाबत या चर्चेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
या वेळी कृषी विभागाचे अधिकारी आणि हुक्केरी तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.
राजू बागलकोटी
इन न्यूज, हुक्केरी


Recent Comments