काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेत्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि मंत्री एच. के. पाटील यांनी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. पक्षाचे हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी पूर्ण आदर करतो, असे सांगत नगरपालिकेचे सदस्य आणि विविध संस्थांच्या पदाधिकार्यांनी दिलेले राजीनामे तातडीने मागे घ्यावेत, अशी विनंती त्यांनी केली.

माध्यमांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मनात काही खंत असू शकते. मात्र सर्व मतभेद बाजूला ठेवून आपल्या पक्षाचे सरकार अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. या संदर्भात एआयसीसीचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला आणि राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ पुनर्रचना आणि मंत्रिपदाबाबत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना सर्व राजकीय प्रश्नांवर मौन हेच माझे उत्तर आहे, असे सांगत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला. हायकमांडच्या सूचनेनुसार पक्ष आणि सरकारचे हित जपणे हेच सर्वांचे मुख्य ध्येय असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments