Belagavi

विबी जी राम जी योजनेंतर्गत मजुरांना निरंतर काम द्या : सीईओ राहुल शिंदे

Share

विकासीत भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच विबी जी राम जी योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात मजुरांना नियमितपणे कामाची उपलब्धता करून द्यावी, अशी सक्त ताकीद जिल्हा पसंत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.

बेळगाव येथील जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पावसाचे प्रमाण अपुरे असल्याने ग्रामीण भागात रोजगाराची नितांत गरज असून, जिपम स्तरावरून त्वरित मंजुरी मिळण्यासाठी नवीन कामांचा कृती आराखडा तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्याचे आवाहन राहुल शिंदे यांनी केले. कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी विबी जी राम जी योजना अत्यंत प्रभावी ठरणार असून, याद्वारे दीर्घकालीन जीवनावश्यक कामांना गती द्यावी, असे ते म्हणाले.

या योजनेंतर्गत जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित तब्बल ३१३ हून अधिक कामांना मंजुरी मिळण्याची संधी आहे. या सर्व संधींचा लाभ घेत गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोमाळ जमिनींची पाहणी करून जनावरांसाठी चारा पुरवठा सुनिश्चित करावा, अशा सूचना पशुसंगपालन विभागाला देण्यात आल्या. तसेच शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य, कृषी आणि फलोत्पादन यांसारख्या विविध विभागांनी परस्पर समन्वयातून प्रभावी विकास कामे हाती घ्यावीत, असे राहुल शिंदे यांनी सांगितले.

Tags: