हुबळीमध्ये हिजाब आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत प्रमोद मुतालिक यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली असून येत्या १ जूनपासून शाळा-कॉलेजांमध्ये केशर शाली वाटप करण्याची घोषणा केली आहे.

हुबळीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवरही जोरदार निशाणा साधला. विरोधी पक्षांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून भूमिका घेणे गरजेचे होते, मात्र केवळ विधाने करून त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी म्हटले. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबचा वाद पुन्हा निर्माण झाल्यास त्याला प्रत्युत्तर म्हणून केशर शाली वाटप अभियान सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला.

देशातील अवैध बांगलादेशी स्थलांतरितांच्या समस्येवर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर अनेक बांगलादेशी मुस्लिम देशाच्या विविध भागांत पसरले असून तिथल्या जवळपास ९१ लाख मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत, ज्यामध्ये बहुतांश नागरिक हे बांगलादेशी वंशाचे असल्याचा दावा त्यांनी केला.
नुकतीच हुबळी रेल्वे स्थानकावर दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते, ज्यांनी स्वतःला बिहार आणि कोलकाता येथील रहिवासी असल्याचे सांगितले. रेल्वे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करणे अपेक्षित असताना त्यांना सोडून दिल्यामुळे संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संशयास्पद रित्या येणाऱ्या समूहांची तात्काळ तपासणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. भारत ही धर्मशाळा नसून याचा गैरवापर रोखला पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
या मुद्द्यांवर विरोधी पक्ष पूर्णपणे शांत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. हिजाबचा विषय असो की अवैध बांगलादेशी स्थलांतरितांचा प्रश्न, कोणीही आवाज उठवायला तयार नाही आणि विरोधकांनी आता तरी जागे होऊन जनतेच्या प्रश्नांवर बोलले पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रमोद मुतालिक यांनी दिली.


Recent Comments