Bailahongala

कित्तूर राणी चन्नम्मांच्या अवमानावरून बैलहोंगलमध्ये जनक्षोभ

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगलमध्ये कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या स्मृतीस्थळाचा अवमान झाल्याच्या आरोपावरून आज शहरात विराट मोर्चा काढण्यात आला.

गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आज भव्य रॅलीचे स्वरूप प्राप्त झाले. राणी चन्नम्मा यांच्या समाधी स्थळाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याचे घाईघाईने उद्घाटन केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या विकासकामात आणि रॉक गार्डनच्या निर्मितीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. चन्नम्मा विकास प्राधिकरणासाठी तात्काळ २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली.

यावेळी बोलताना जय मृत्युंजय स्वामीजी यांनी सरकार आणि आमदारांना कडक शब्दांत सुनावले. “चन्नम्मा यांच्या अस्मितेशी खेळू नका, हा विषय गांभीर्याने घ्या,” असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनादरम्यान राणी चन्नम्मा चौक ते संगोळी रायण्णा चौकापर्यंत बाईक, ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

जेडीएस नेते शंकर माडलगी यांनी आमदारांवर घणाघाती टीका करताना सांगितले की, २३ दिवस उलटूनही आमदार जनतेचे गाऱ्हाणे ऐकायला तयार नाहीत. “आमच्यावर ६८ गुन्हे दाखल केले तरी आम्ही डगमगणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाजप नेते व्ही. आय. पाटील आणि आमदार अरविंद बेल्लद यांनीही सरकारच्या भ्रष्टाचारावर कडाडून हल्ला चढवला. या आंदोलनात शेतकरी संघटना, कन्नड रक्षण वेदिका आणि चन्नम्मा प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: