Vijayapura

दर निश्चित होऊनही विजापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

Share

ऊस उत्पादकांच्या आंदोलनापुढे झुकून दर निश्चित केल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. या निर्णयामुळे बेळगावच्या ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे गोंधळ निर्माण झाला असून, त्यांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. याविषयी सविस्तर माहिती…

गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेल्या ऊस उत्पादकांच्या आंदोलनापुढे राज्य सरकारने अखेर माघार घेतली.दर निश्चित करण्याच्या रस्सीखेचीत अडकलेल्या शेतकरी आणि सरकार यांच्यात अखेरीस एकमत झाले आहे. उसाला देण्यात येत असलेल्या हमीभावात १०० रुपयांची वाढ करण्यात आली असून, ३,२०० रुपये असलेला हमीभाव ३,३०० रुपये पर्यंत वाढवला गेला आहे. आंदोलनाचे प्रमुख केंद्र असलेल्या गुर्लापूर क्रॉस येथे या घोषणेनंतर जल्लोष दिसून आला, तर काही ठिकाणी मात्र विरोधाचे सूर उमटले आहेत. आंदोलन स्थगित केलेल्या शेतकऱ्यांमध्येच यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत बेळगावच्या शेतकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आणि आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

परंतु, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मात्र आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. विजापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या मागण्यांबाबत कोणतीही स्पष्टता मिळाली नसल्याने, त्यांनी आपले धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी इशारा दिला आहे की, “आम्ही शनिवारपर्यंत वाट पाहू. तोपर्यंतही स्पष्टता मिळाली नाही, तर महामार्ग बंद केला जाईल.”

शेतकरी संघटनेचे नेते संगमेश सगर यांनी यावेळी बोलताना असे स्पष्ट केले की, “विजापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या मागण्यांबाबत कोणतीही स्पष्टता मिळाली नसल्याने आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आमच्या जिल्ह्याच्या मागणीचा कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. शनिवार एक दिवस आम्ही वाट पाहू, त्यानंतरही स्पष्टता न मिळाल्यास महामार्ग बंद करू.”

एकंदरीत, सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादकांमध्ये आनंद आहे. या लढ्यामुळे १०० रुपये तरी वाढले, याचे त्यांना समाधान आहे. मात्र, विजापूर आणि बागलकोटच्या शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. आज ते आपले आंदोलन सुरू ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Tags: