बेळगाव जिल्हा आणि पश्चिम घाट परिसरात होत असलेल्या पावसामुळे कोरडी पडलेली मलप्रभा नदी पुन्हा वाहू लागली आहे. काही दिवसांपूर्वी पाण्याच्या समस्येमुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या नवीन पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.


गेल्या तीन-चार दिवसांपासून पश्चिम घाट आणि बेळगाव जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे मलप्रभा नदीतील पाण्याची आवक लक्षणीय वाढली आहे. पंधरवड्यापूर्वी नदीतील पाणीपातळी पूर्णपणे खालावल्याने नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र आता पाणी वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नदीच्या वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने शेतीकामांसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता दूर झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहराजवळून वाहणाऱ्या मलप्रभा नदीची ही स्थिती पाहण्यासाठी स्थानिक नागरिक नदीकाठच्या परिसरात गर्दी करत आहेत. या पावसामुळे कृषी क्षेत्राला नवी उमेद मिळाली असून, आगामी काळात असाच पाऊस सुरू राहिल्यास भागातील जलाशय भरण्यासोबतच भूजल पातळीतही मोठी वाढ होईल, अशी आशा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शानुल मत्तेखान
इन न्यूज
बैलहोंगल


Recent Comments