कित्तूर तालुक्यातील तिगडोळ्ळी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बहुग्राम पेयजल योजनेच्या कामातील हलगर्जीपणामुळे हा रस्ता अपघातांचे केंद्र बनला आहे.


तिगडोळ्ळी गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील हिरेमड्डीजवळ सध्या बहुग्राम पेयजल योजनेच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे उन्हाळ्यात वाहनधारकांना धुळीचा सामना करावा लागला होता, तर आता पावसाळा सुरू होताच संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्याचे मुख्य केंद्र असल्याने या रस्त्यावरून कित्तूर शहरात जाणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. मात्र, रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरून रोज अपघात होत असून अनेक नागरिक जखमी होत आहेत. अपघातांमुळे कपडे खराब होऊन अनेकांना घरात परत जावे लागत आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना चिखलापासून काळजी घेण्याचा सल्ला आता गावातील ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांना द्यावा लागत आहे.
उन्हाळ्यात धुळीचा प्रचंड त्रास सहन केल्यानंतर आता पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.


Recent Comments