बागलकोटमध्ये एका पाण्याच्या टाकीत पडून १८ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र, या मृत्यूनंतरही बाळाला जिवंत करण्यासाठी कुटुंबीयांनी अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बागलकोटमधील नवनगर येथील सेक्टर नंबर ३८ मध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. घरासमोर असलेल्या एका रिकाम्या घराच्या पाण्याच्या टाकीत खेळता खेळता पडल्याने १८ महिन्यांची अमिना पठाण या चिमुरडीचा गुदमरून मृत्यू झाला. घटनेनंतर बाळाला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित करून शवविच्छेदनही केले. असे असतानाही, आपल्या पोटच्या गोळ्याला गमावल्याच्या धक्क्यातून कुटुंबीयांनी विज्ञानालाही थक्क करणारी अंधश्रद्धा दाखवली.

शवविच्छेदनानंतर मृतदेह घरी आणल्यावर, मिठात दोन तास ठेवल्यास बाळ पुन्हा जिवंत होईल या अंधश्रद्धेला कुटुंबीय बळी पडले. संध्याकाळी ५ वाजल्यापासून चिमुरडीच्या गळ्यापर्यंत मीठ भरून चमत्कार घडेल या आशेने कुटुंब वाट पाहत बसले होते. नवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आजच्या आधुनिक युगातही अशा अंधश्रद्धा पाहायला मिळत असल्याबद्दल परिसरातून खेद व्यक्त होत आहे.


Recent Comments