बागलकोट शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांत कुत्र्यांच्या हल्ल्यात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर बागलकोट नगरपरिषदेने अखेर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘डॉग कॅचिंग ऑपरेशन’ सुरू केले असून यासाठी विशेष पथका पाचारण करण्यात आले आहे.

बागलकोट शहरात भटक्या कुत्र्यांचे कळपच्या कळप फिरत असून त्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता नगरपरिषद प्रशासनाने या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शहरातील कुत्र्यांना पकडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

या मोहिमेबाबत स्थानिक रहिवासी एम. एम. नदाफ यांनी सांगितले की, शहरात कुत्र्यांची दहशत खूप वाढली होती आणि या कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
बागलकोट नगरपरिषद हद्दीतील नवनगर आणि विद्यागिरी भागात हा त्रास सर्वाधिक आहे. यावर उपाय म्हणून नगरपरिषदेने थेट आसाममधून ‘एबीसी डॉग कॅचिंग’ पथकाला पाचारण केले आहे. हे पथक शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करत आहे आणि त्यांना रेबीज प्रतिबंधक लस टोचत आहे. आसामहून आलेल्या या पथकाने १० वेगवेगळे गट तयार केले असून नवनगर, विद्यागिरी आणि जुने बागलकोट भागात एकाच वेळी ही मोहीम राबवली जात आहे.
या संदर्भात स्थानिक नागरिक एम. ए. मिर्जी यांनी प्रतिक्रिया दिली की, प्रशासनाने घेतलेला हा निर्णय योग्य असून यामुळे महिला आणि मुलांमधील भीतीचे वातावरण कमी होईल.
बागलकोट मध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने आणखी जीवितहानी होण्यापूर्वी नगरपरिषदेने ही कठोर मोहीम हाती घेतली आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.


Recent Comments