Belagavi

बेळगावात 24 तासांहून अधिक काळ चालली श्री विसर्जन मिरवणूक

Share

झांजढोल पथकांचे शिस्तबद्ध ढोलवादन, त्याच्या तालावर युवतींचे तालबद्ध संचलन आणि डीजेचा कडकडाट, अशा वातावरणात गेले 10 दिवस पाहुणचार घेत असलेल्या लाडक्या बाप्पाला बेळगावकरांनी शुक्रवारीपुढच्या वर्षी लवकर याअशी साद घालत जड अंतःकरणाने निरोप दिला. सायंकाळी पाचच्या सुमारास सुरु झालेली श्री विसर्जन मिरवणूक तब्बल 24 तासांहून अधिक काळ चालली, आणि आज शनिवारी सायंकाळी संपली. लाखो लोकांनी हा अद्भुत क्षण याची देही याची डोळा अनुभवला.

 

होय, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी प्रेमाची साद घालत शुक्रवारी समस्त बेळगावकरांनी शुक्रवारी घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्तींचे शहरातील विहिरी, विसर्जन तलाव आणि पालिकेने पुरवलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर, यंदा बेळगावचा गणेशोत्सव जोरदार जल्लोषात साजरा झाला. 10 दिवस भक्तिभावाने विघ्नविनायकाची पूजा करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य मिरवणुकीने गणेशाला निरोप दिला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहरातील हुतात्मा चौकातून सार्वजनिक गणेशमूर्तींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. आ. अभय पाटील, अनिल बेनके, खा. मंगल अंगडी, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आ. संजय पाटील, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, मनपा आयुक्त रुद्रेश घाळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी श्रीफळ वाढवून, ढोल वाजवून विसर्जन सोहळ्याला प्रारंभ केला गेला. यावेळी मान्यवरांनी बेळगावच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा आणि इतिहासाची माहिती देऊन मंडळांना शांततेत मिरवणूक पार पाडण्याचे आवाहन केले.

 

शहरातील जुना व नवीन कपिलेश्वर विसर्जन तलाव, जक्कीनहोंडा, कलमेश्वर तलाव, किल्ला तलावाजवळील विहीर आदी ठिकाणी घरगुती व सार्वजनिक गणेशाचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास भातकांडे गल्ली मंडळाच्या श्रीमूर्तीचे सर्वप्रथम विसर्जन करण्यात आले.

 

कपिलेश्वर मंदिर परिसरातील विसर्जन तलावात प्रामुख्याने धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण मिरवणुकीत विविध वाद्ये आणि कला पथकांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. तरुण-तरुणींनी डीजेच्या तालावर नाचून एकच जल्लोष केला. मिरवणुकीकडे जाणारा रस्ता नागरिकांनी खचाखच भरला होता. सर्वांनी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लौकर या’च्या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप दिला. मिरवणुकीदरम्यान मध्यरात्री दोनच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि काही काळ विस्कळीत होऊनही गणेश भक्तांच्या उत्साह काही कमी झाला नाही.

 

24 तासांहून अधिक काळ चाललेल्या भव्य मिरवणुकीनंतर शनिवारी सायंकाळी 5.15 च्या सुमारास सर्व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर महानगर पालिकेच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ.रुद्रेश घाळी यांनी गणरायाचे पूजन केले. तत्पूर्वी डॉ. रुद्रेश घाळी, मार्केटचे एसीपी नारायण बरमणी, महामंडळ उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह अन्य अधिकारी व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मै हुं डॉन’ या गाण्याच्या तालावर थिरकत नृत्याचा आनंद लुटला.

 

सर्वांच्या सहकार्याने गणेशोत्सव यशस्वी झाल्याचे महामंडळाचे आयुक्त डॉ.रुद्रेश घाळी यांनी सांगितले. महापालिकेकडून आम्ही सर्व प्रकारची व्यवस्था केली आहे. काल दुपारी ३ वाजता पहिल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता आज सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास पालिकेकडून गणेश विसर्जनाने झाली. शांततेत विसर्जन सोहळा पार पाडण्यासाठी सहकार्य दिल्याबद्दल पोलीस विभाग, गणेश मंडळे, महापालिकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

 

बेळगावात गणेशोत्सव विशेषतः विसर्जन सोहळा शांततेत पार पाडणे हे मोठे आव्हान असल्याचे सांगत लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सर्व गणेश मंडळांनी आमच्याशी आणि पोलिस खात्याशी चांगल्या पद्धतीने हातभार लावला, त्यामुळे गणेशोत्सवाच्या यशस्वि होण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे अभिनंदन करतो असे सांगितले.

 

बेळगाव जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस विभाग व इतर विभागांच्या अथक परिश्रमाने बेळगावात कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेशोत्सव विसर्जन सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

Tags:

#बेळगावात 24 तासांहून अधिक काळ चालली श्री विसर्जन मिरवणूक