बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या समस्येमुळे स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकांनी तीव्र आंदोलन केले. महानगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्यातील हद्दीच्या वादामुळे गेल्या महिनाभरापासून येथील मुख्य रस्त्यांवर कचरा सडत आहे.


साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून शाळकरी मुले, महिला आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधून वीस दिवसांपेक्षा जास्त काळ झाला, तरीही दोन्ही संस्था जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

महापालिका अधिकारी हा भाग ग्रामपंचायतीचा असल्याचे सांगत आहेत, तर पंचायतीचे अधिकारी महापालिकेकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. रस्त्यावरील कचऱ्यामुळे नुकताच एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. प्रशासनाने तातडीने कचरा न हटवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


Recent Comments