Belagavi

गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी

Share

देशभरात गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी बेळगावमध्ये गोरक्षक आणि विविध संघटनांच्या वतीने ‘गो सन्मान आव्हान अभियान’ राबवण्यात आले.

या अभियानांतर्गत बेळगावमध्ये गोरक्षकांनी भव्य निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. भारतभर गोहत्या पूर्णपणे थांबवून गोमातेचा यथोचित सन्मान व्हावा, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली.

गोमातेला सुरक्षा आणि सेवा मिळणे आवश्यक आहे. संपूर्ण भारतात गोहत्या पूर्णपणे प्रतिबंधित करावी आणि गोमातेला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून द्यावा, या मागणीसाठी सरकारला निवेदन देण्यात येत असल्याचे श्री गौरवानंद सरस्वती स्वामीजी यांनी म्हटले.

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली तरी गोहत्या थांबलेली नाही, ही खेदाची बाब आहे. हे रोखण्यासाठी कडक कायदा लागू करून गायीला राष्ट्रमाता घोषित करावे, अशी मागणी एका आंदोलकाने व्यक्त केली.

यावेळी गोरक्षक निलेश, हरिनाम, रविकुमार कोकितकर, किरण गावडे, मारुती कोळी, आनंद शेट्टी यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: