राजकीय वर्तुळात ‘जोडगोळी’ म्हणून ख्याती असलेले आमदार लक्ष्मण सवदी आणि आमदार राजू कागे यांनी डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. यावेळी त्यांनी “आम्ही केवळ बाहुले आहोत, वर बसलेला सूत्रधार खेळ खेळवत असतो. आम्ही कोणाच्याही बाजूने नाही आणि कोणाच्या विरोधातही नाही,” असे स्पष्ट केले.

आज डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी अथणीतून लक्ष्मण सवदी आणि कागवाडमधून राजू कागे एकाच गाडीतून आले आणि त्यांनी अर्ज दाखल केला. या राजकीय जोडगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

त्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले, “१९९५ मध्ये डीसीसी बँकेत मला पाठवण्यात राजू कागे यांचा मोठा वाटा आहे. १५५ पीकेपीएस प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नेत्यांचे मत घेऊन ही जोडगोळी निवडणूक लढवत आहे.” पुढे ते म्हणाले, “सूर्य-चंद्राला ग्रहण रोज लागत नाही. जेव्हा जेव्हा ग्रहण येते, तेव्हा पूजा-अर्चा करावी लागते.” राजू कागे आणि आम्ही एक गट तयार केला असून, “आलेल्यांचे स्वागत करतो आणि गेलेल्यांचे आभार मानतो,” “वर बसलेला सूत्रधार खेळ खेळवत असतो, आम्ही सर्व बाहुले आहोत.” अध्यक्षपदासाठी आम्ही इच्छुक नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. भालचंद्र जारकीहोळी यांनी ‘अथणी आणि कागवाडमधून आम्ही निवडणूक लढवणार नाही,’ असे जे विधान केले होते, त्यावर आम्ही दोघांनी आता अर्ज भरल्याने हा प्रश्न अप्रस्तुत ठरतो, असे त्यांनी सांगितले.
राजू कागे यांच्या मतदारसंघात २४ मतदार असून, त्यापैकी २० जणांचा पाठिंबा आहे. अथणीमध्ये १२५ पैकी १२२ लोकांनी पाठिंबा दर्शविला आहे. आम्ही कोणालाही पैसे दिलेले नाहीत. वेगवेगळ्या गटात असले तरी, बँकेचे सर्व संचालक माझे मित्र आहेत. अर्ज मागे घेण्याच्या वेळी सर्व काही स्पष्ट होईल. राजकारण न करता, प्रतिष्ठेचा प्रश्न न करता बँकेला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने काम करावे, अशी त्यांनी विनंती केली. कत्ती यांच्यासोबत चर्चा झाली आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, “आम्ही रोज बोलतो. याला राजकारण बनवून विषयाला फाटे फोडू नका.” असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांना केले. यावेळी ‘नोव्हेंबर क्रांती होऊन मुख्यमंत्री बदलणार का?’ असे विचारले असता, “तुम्ही चुकीच्या पत्त्यावर पत्र पाठवल्यास उत्तर मिळणार नाही,” असे मार्मिक उत्तर त्यांनी दिले.
कागवाडचे आमदार राजू कागे म्हणाले की, सहकार क्षेत्रात आपण पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहोत, हा आमच्यासाठी नवा अनुभव आहे. ३०-३५ वर्षे एकाच तालुक्यात असल्यामुळे आम्ही लक्ष्मण सवदींना पाठिंबा देत होतो. आता कागवाड हा नवीन तालुका झाला असून, सर्वांच्या मतानुसार आम्ही निवडणूक लढवत आहोत. “आम्ही कोणाच्या बाजूने नाही आणि विरोधातही नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या वेळी सवदी आणि कागे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments