विजापूर जिल्ह्यामध्ये कमी खर्च आणि अधिक नफा मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घेतले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हे पीक खराब होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकावर बुरशीजन्य रोग आल्याने ते पूर्णपणे खराब होत आहे.

जिल्ह्यातील १२,२५० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर कांद्याची पेरणी करण्यात आली आहे. जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पन्नाच्या आशेने कमी उंचीच्या भागांत लागवड केली आहे. सततच्या पावसामुळे थंडी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून कांद्याचे पीक सडू लागले आहे. या रोगामुळे सुरुवातीला कांद्याची पाने पिवळी पडतात आणि नंतर मुळे कमकुवत होऊन सडून जातात. यामुळे संपूर्ण पीक जागेवरच कोसळते. शेतकरी हे पीक वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारत असले, तरी रोगावर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे.
या वर्षीच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बागायती विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून योग्य ती नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
काही शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘एक एकरमधील कांद्याचे पीक पूर्णपणे खराब झाले आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे. दिवसेंदिवस रोग वाढत असून, पिकाची देखभाल आणि औषधांचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित मदत करावी.’ तर दुसरीकडे, या रोगापासून पिकाला वाचवण्यासाठी शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच अधिक प्रादुर्भाव आढळल्यास औषधांची फवारणी करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एनडीआरएफच्या माहितीनुसार, पिकांच्या नुकसानीसाठी आपत्कालीन निधीतून मदत दिली जाईल. या संदर्भात बागायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी शेतकऱ्यांनी सांगितले.
एकूणच, निसर्गाच्या या संकटाने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, सरकारने याकडे लक्ष देऊन मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.


Recent Comments