Belagavi

बेळगावातील समर्थ नगरमध्ये रस्ते की चिखलाचे साम्राज्य?

Share

बेळगावातील समर्थ नगरमधील नागरिकांवर सध्या जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली असून येथील चिखलाने भरलेले खड्डे, या भागातील रस्त्यांची भीषण अवस्था आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकणारा हा सविस्तर रिपोर्ट…

पाऊस सुरू झाला की, इथल्या लोकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊनच घराबाहेर पडावं लागतं. कधी कोण पडेल, कुणाचे हात-पाय तुटतील, या चिंतेतच येथील नागरिक दिवस काढत आहेत. हे रस्ते आहेत की पाण्याने भरलेले तलाव, हेच कळत नाही, अशी इथल्या रस्त्यांची अवस्था आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यावरून जीवघेण्या परिस्थितीत रस्ता शोधत आणि जपून पाऊल टाकत पुढे जाणारे वृद्ध नागरिक, तसेच खड्डे चुकवत दुचाकी चालवण्यासाठी धडपडणारे नागरिक रोजच इथे दिसतात. ही दृष्यं कुठल्याही अविकसित झोपडपट्टीची नाहीत. हे बेळगावच्या समर्थ नगरमधील ५ व्या क्रॉसचं वास्तव आहे.

या भागात डांबरी रस्ता नसल्यामुळे लोकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात तर त्यांची अवस्था असह्य होते. एका बाजूला योग्य गटार व्यवस्था नसल्यामुळे पावसाचं पाणी थेट घरांमध्ये शिरतं, तर दुसऱ्या बाजूला ये-जा करण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे कितीही महत्त्वाची अडचण असली तरी घरातच थांबून राहावं लागतं. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा वृद्धांना दवाखान्यात किंवा इतर कोणत्याही कामासाठी बाहेर पडायचं असेल, तर त्यांना जीव धोक्यात घालूनच या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत, की हे चिखलाने भरलेले आखाडे आहेत, हेच कळत नाही. ऑटो रिक्षाचालकही आता ५ व्या क्रॉसमध्ये येण्यास टाळाटाळ करतात, अशी इथल्या नागरिकांची तक्रार आहे. नुकतीच सरोजिनी मुळीमनी नावाच्या एका वृद्ध महिलेला याच रस्त्यावर पडून दुखापत झाल्याची घटनाही घडली आहे.

इथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही वर्षांपूर्वी येथे रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु, आता त्याचे कोणतेही चिन्ह उरले नाही; रस्ता पूर्णपणे उखडला आहे आणि जागोजागी पाण्याचे छोटे तलाव तयार झाले आहेत. रात्रीच्या वेळी येथून प्रवास करणे म्हणजे मोठीच जोखीम आहे. त्यामुळे, संबंधित प्रशासनाने येथील परिस्थितीची गंभीर दखल घेऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी येथील नागरिकांची आग्रहाची मागणी आहे.

मोठे अपघात होऊन जीवितहानी होण्यापूर्वीच, संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी येथे चांगला रस्ता आणि गटार व्यवस्था निर्माण करून पावसाचे पाणी सहजपणे वाहून जाईल याची खात्री करावी, अशी समर्थ नगर ५ व्या क्रॉसच्या रहिवाशांची प्रशासनाकडे विनंती आहे.

Tags: