Belagavi

ऑपरेशन सिंधूरला बेळगावकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

Share

पहलगाममध्ये भारतीय नागरिकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर दिलं असून, ‘ऑपरेशन सिंधूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 अतिरेकी ठिकाणांचा उद्ध्वस्त केला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये देशभक्तीने भारलेल्या प्रतिक्रिया उमटल्या असून, नागरिकांनी भारतीय सेनेच्या धाडसी कृतीला सलाम केला आहे.

पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील 9 अतिरेकी तळांवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला हे पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला थेट उत्तर असल्याचं बेळगावकरांनी म्हटलं आहे. बेळगावचे ज्येष्ठ नागरिक चन्नप्पा यांनी सांगितलं की, 68व्या बॅचचे अधिकारी अजीत आणि चिकोडीचे जयशंकर हे भारतीय सेनेत उत्कृष्ट सेवा बजावत असून, सैन्याच्या या पराक्रमाने देशाची मान उंचावली आहे.

अ‍ॅड. सुनील तुबची म्हणाले, पाकवर झालेला हा हल्ला म्हणजे भारताच्या वीरगती प्राप्त झालेल्या नागरिकांच्या आत्म्यासाठी श्रद्धांजली आहे. पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. सरिता मीरजकर म्हणाल्या, पहाटेच ऑपरेशन झाल्याचं समजताच आम्हाला आनंद झाला. आता अजून ठिकाणी असे हल्ले व्हावेत आणि अतिरेक्यांचे मूळ कायमचे नष्ट करावं.

एस.एस. किवडसण्णवर, बेळगाव वकील संघाचे अध्यक्ष म्हणाले, ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून मोदींनी अतिरेक्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. अ‍ॅड. महांतेश पाटील यांनी सांगितलं की, ही केवळ केंद्र सरकारची किंवा सेनेची नाही, तर प्रत्येक भारतीय नागरिकाची विजयगाथा आहे. यामुळे आता शत्रु राष्ट्रांनी भारताला खिजवण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल.

Tags: