Vijayapura

मोबाईलपासून दूर राहा, एकाग्रतेने अभ्यास करा: श्री कैवल्यमयी माताजी

Share

भजन आणि नामस्मरणामुळे मनाची चंचलता नियंत्रित करता येते. मनावर ताबा ठेवून अभ्यास केल्यास विद्यार्थी जीवनात यश संपादन करू शकतात, असे प्रतिपादन विजापूर येथील कृपामयी शारदाश्रमाच्या अध्यक्षा परमपूज्य श्री कैवल्यमयी माताजी यांनी केले.

विजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या रवींद्रनाथ टागोर सीबीएसई शाळा आणि पीयू सायन्स कॉलेजमध्ये गणेशोत्सवानिमित्त भजन व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री कैवल्यमयी माताजी यांनी गणेश पूजनाचे महत्त्व आणि गणपतीच्या रूपात असलेला अध्यात्मिक संदेश स्पष्ट केला. गणपतीचे मोठे मस्तक विशाल विचारांचे, मोठे कान चांगल्या गोष्टी ऐकण्याचे, लहान डोळे एकाग्रतेने ध्येयाकडे पाहण्याचे आणि मोठे पोट आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टी समभावाने स्वीकारण्याचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी जीवनात एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे. आजकाल मोबाईलच्या अती वापरामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असून वेळ वाया जाण्यासोबतच अभ्यासावरील एकाग्रता कमी होत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर केवळ गरजेपुरताच केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. दररोज थोडा वेळ नामस्मरण, ध्यान आणि चांगल्या विचारांसाठी दिल्यास मन नियंत्रित राहते. विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्त्व ओळखून श्रद्धेने अभ्यास केल्यास उच्च यश मिळवता येते, असे त्या म्हणाल्या. या वेळी विद्यार्थ्यांनी भजनात भाग घेतला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार सारवाड, प्रशासकीय अधिकारी संजीव मिर्जी, प्राचार्य अभिजित गायकवाड, उपप्राचार्य जुबेर सय्यद उपस्थित होते.

Tags: