बेळगावमधील तुरमुरी गावातील कचरा डेपोमुळे ग्रामस्थांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत असून, ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्याच्या मागणीसाठी आज गावचे नेते आणि रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

बेळगाव ग्रामीण भागातील तुरमुरी गावातील कचरा डेपोची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, आज ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन निवेदन दिले. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार हा कचरा डेपो इतरत्र हलवण्याची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे आश्वासन केवळ कागदावरच राहिले असून प्रत्यक्षात कोणताही बदल झालेला नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.

गेल्या २० वर्षांपासून या कचरा डेपोमुळे गावात दुर्गंधी सुटली असून आजारांची भीती वाढली आहे. या संदर्भात यापूर्वी अनेकदा चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला असला, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही योग्य कारवाई केलेली नाही, असा संताप नेते नागराज जाधव यांनी व्यक्त केला. हा बेकायदेशीर कचरा डेपो तात्काळ तेथून हटवावा, अन्यथा आगामी दिवसांत सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याप्रसंगी तुरमुरी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments