कर्नाटक सरकारने कामगारांच्या किमान वेतनात केलेल्या वाढीच्या दुरुस्ती आदेशाविरोधात बेळगावात औद्योगिक संघटनांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने शहरातील राणी चन्नम्मा चौकाजवळील कन्नड साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी, सचिव सतीश कुलकर्णी आणि संचालक एम. के. हेगडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो व्यापारी आणि उद्योजकांनी जिल्हा प्रशासनामार्फत सरकारला निवेदन सादर करून हा आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी केली.


आंदोलनाचे नेतृत्व करणारे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी यांनी सरकारच्या धोरणावर टीका करताना सांगितले की, “सरकारने कामगारांचे किमान वेतन अचानक १२ हजार रुपयांवरून २० हजार रुपये केले आहे. सरकारच्या या अवैज्ञानिक निर्णयामुळे लघु आणि मध्यम उद्योगांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. आधीच अनेक लहान उद्योग आर्थिक नुकसानीमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने उद्योजकांच्या हितासाठी या वेतनवाढीच्या निर्णयाचा तात्काळ पुनर्विचार करावा, अन्यथा आगामी दिवसांत आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”

यावेळी सतीश कुलकर्णी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्याही राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेतनवाढ करण्यात आलेली नाही. सरकारने आधीच सर्व कर वाढवले असून, आता या निर्णयामुळे लघु उद्योजक अडचणीत आले आहेत. सरकारने विविध घटकांसाठी भाग्य योजना लागू केल्या आहेत, त्याच धर्तीवर कामगारांनाही शासनाने स्वतः पाच हजार रुपये द्यावेत. मोठ्या कंपन्यांचा विचार करून सरकारने असा अवैज्ञानिक निर्णय घेऊ नये, कारण इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यात आधीच जास्त वेतन दिले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या निषेध मोर्चात चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य आणि स्थानिक उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments