Belagavi

रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा : खासदार जगदीश शेट्टर

Share

बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे मार्गिकेसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर प्रलंबित आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रेल्वेचे काम सुरू करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना खासदार जगदीश शेट्टर यांनी रेल्वे प्रकल्पाच्या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने भूसंपादनाची उर्वरित प्रक्रिया गतिमान करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिल्यास या मार्गाचे काम तातडीने सुरू होऊ शकते. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया जगदीश शेट्टर यांनी दिली.

बेळगावमधील शिवम असोसिएट्सकडून झालेल्या कथित ४,५०० कोटी रुपयांच्या ठेव फसवणूक प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. या प्रकरणाची सखोल चौकशी सध्या सुरू असून, सामान्य ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जगदीश शेट्टर यांनी केली.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करताना त्यांनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री सिद्धरामैया आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात अंतर्गत वाद उफाळला आहे. या दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत कलहामुळेच राज्यातील काँग्रेस सरकार लवकरच कोसळेल, असा दावा जगदीश शेट्टर यांनी केला.

Tags: