जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायतीच्या वतीने सुवर्ण विधानसभा संकुलात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


बेळगाव मधील सुवर्णसौध येथे आज ‘बेळगाव प्रकाश’ उपक्रमांतर्गत २८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्लीतील द्वारका येथे युपीएससीच्या गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ३० कोटी रुपये खर्चून भव्य भवन उभारले जाईल, अशी घोषणा केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेसाठी कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले, तसेच यमकनमर्डी व हारूगेरी येथे हायटेक ग्रंथालये उभारली जात असल्याचे सांगितले.


जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा आयोजित केल्याचे सांगितले. देश व समाज उभारणीत तरुणांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे आभार मानले.
या सोहळ्यात केंद्रीय लोकसेवा आयोग, एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, आमदार राजू आसिफ शेठ, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा हमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी, वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनुमन्नावर, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments