बेळगावच्या रामतीर्थनगरमधील ‘बुडा’च्या मालकीच्या जागेवर अल्पसंख्याक विकास विभागाने अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत रहिवाशांनी तीव्र निदर्शने केली. वादग्रस्त सीमाभिंत पाडल्यानंतरच नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.


रामतीर्थनगरमधील अल्पसंख्याक विभागाच्या वसतिगृहासमोरील बुडाची जागा विभागाने अनधिकृतपणे ताब्यात घेऊन तिथे भिंत बांधली होती. या कृत्याचा स्थानिक रहिवाशांनी जोरदार निषेध केला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुविधा देण्याऐवजी अधिकारी जागा बळकावण्यात धन्यता मानत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने ही भिंत पाडावी, अशी मागणी महंतेश वक्कुंद यांनी केली. जोपर्यंत ही भिंत पाडली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा रहिवाशांनी दिला होता.
उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी सांगितले की, रामतीर्थनगरमध्ये अनेक संघर्षांनंतर विकासकामे सुरू झाली आहेत. उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे झाला आहे. याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्याचे हनुमंत कोंगाळी यांनी स्पष्ट केले.
स्थानिकांच्या वाढत्या दबावामुळे अखेर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अनधिकृतपणे बांधलेली भिंत पाडली. यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त करत आपले धरणे आंदोलन स्थगित केले.


Recent Comments