Belagavi

बेनकनहळ्ळीतील केंबाळी नाल्याचे पाणी रस्ता, शिवारात

Share

बेळगाव परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेनकनहळ्ळीतील केंबाळी नाला ओसंडून वाहत आहे. नाल्यालगतच्या शेतात आणि रस्त्यावर पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

गेल्या 4 दिवसांपासून बेळगावच्या आसपासच्या भागात मुसळधार पावसामुळे बेनकनहळ्ळीतील केंबाळी नाला ओसंडून वाहत आहे. आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कालवा तुडुंब भरला असून रस्त्यावर सर्वत्र पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे येथून येणाऱ्या प्रवाशांचे व ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. लोक जीव धोक्यात घालून ओसंडून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून जात आहेत. नाल्याच्या शेजारच्या जमिनीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

याबाबत बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, बेनकनहळ्ळी परिसरात अतिवृष्टीमुळे या नाल्याला पूर आला असून मोठ्या प्रमाणात पाणी शिवारात आणि रस्त्यावर वाहून गेले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. याबाबत आम्ही पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा दाद मागितली आहे. हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर एक व्यक्ती पडल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे त्याला तीन लाख रुपये खर्च करावे लागले. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी बोलताना गावातील एका शेतकऱ्याने सांगितले की, बेनकनहळ्ळी गावाच्या आजूबाजूच्या गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे केंबाळी नाल्यात बरेच पाणी वाहून गेले आहे. रस्त्यावर सर्वत्र पाणी वाहत असून शेतातील सर्व पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. मला चार मुले आहेत. आमच्या उपजीविकेसाठी आम्ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहोत. शेतात असे पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले तर मग आम्ही जगायचं कसं? सरकार आमच्या मदतीला आले नाही तर येत्या काळात आम्हाला आणखी त्रास सहन करावा लागेल, सरकारने आमच्या मदतीला यावे, असे आवाहन त्यांनी केले.

केंबाळी नाला पुलाची मुदत संपली आहे, याठिकाणी उंचावर नवीन पूल बांधण्यात यावा, खराब रस्ते सुधारावेत. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags: