Belagavi

शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

नजीकच्या काळात कृषी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे आयोजित कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी विभाग आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी सीपीडी मैदानावर झाले.
कृषी महोत्सवात कृषी यंत्रसामग्रीचे 60, कीटकनाशक, खत, बियाणे मिश्रण 40, सिंचन 20, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त वाहनांचे 20, सौरऊर्जेचे 20 असे एकूण 120 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. संध्याकाळी लोकगीतांसह सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले की, आजकाल लोक छंदासाठी जमीन खरेदी करत आहेत. शेतीसाठी जमीन वापरल्यास यश मिळू शकते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या वतीने पहिला कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. कृषी महोत्सवात यंत्रसामग्रीचे बरेच स्टॉल असतात. शेतकऱ्यांना नवीन पिके आणि बाजारपेठेची कल्पना मिळाल्यास ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतात, असे ते म्हणाले.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलने जनतेला, समाजाच्या आणि बेळगावच्या हिताचे काम करावे. शासन व जिल्हा प्रशासन आपल्याला सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.  धारवाड कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पी. एल. पाटील म्हणाले की, बेळगावातील शेतकरी आणि लोकांसाठी पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात अनेक स्टॉल्स उभारून विविध तंत्रज्ञानयुक्त कृषी यंत्रांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल करत आहे, हे कौतुकास्पद आहे.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल समाजसेवा करण्यासाठी ओळखला जातो. शेतकरी वाचवण्यासाठी त्यांनी कृषी क्षेत्रात आस्था दाखवली हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. बेळगावात मुबलक पाऊस पडतो आणि पिके येतात. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक नफा कमविण्याची संधी आहे. शेतकऱ्यांनी शेतीला उद्योग म्हणून स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ सेंट्रल बेळगावचे अध्यक्ष मंजुनाथ अळवणी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, बेळगावमध्ये प्रथमच शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित कृषी मेळाव्यात 200 हून अधिक शेतीशी संबंधित स्टॉल लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेतीसाठीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, रोटरीचे गव्हर्नर नासीर बोरसादवाला, महापालिका उपायुक्त उदयकुमार तळवार, अभय जोशी, शकील शेख आदी उपस्थित होते.

Tags: