स्वराज्य आणि धर्मनिष्ठा जोपासून शूर वीर संभाजीराजेंनी मुघल साम्राज्याशी कडवी झुंज देत 120 युद्ध खेळून ती जिंकली आणि मराठेशाहीचे अस्तित्व अबाधित ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्य घडविण्यांत शूरवीर संभाजीराजे यांनी मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन भाजपाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांनी केले.
धर्मवीर संभाजीराजे चौक स्मारक सुशोभीकरण समितीच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यांत आला, त्याप्रसंगी बेनके बोलत होते. प्रारंभी माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून विधिपूर्वक पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
माजी आमदार अनिल बेनके पुढे म्हणाले की, शुरवीर संभाजीराजे यांना वयाच्या अवघ्या नवव्यावर्षी छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार अनुभवयाला मिळाला. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहीला होता. केशवभट आणि उमाजी पंडीतांच्या तालमीत त्यांचे शिक्षण झाले. परकीय लेखकांनीही त्यांच्या युद्धनितीची वाहवा केली. गागाभट यांच्याकरवी त्यांनी नितीमुल्यांची शिकवण देणारा समयनय ग्रंथ लिहून घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजीराजेंनी चिंचवड मोरगांव गणपती, सज्जनगड, चाफळ, हिंगणवाडी आदि देवस्थानांची देखभाल करत धर्म जोपासण्याचे महान काम केले असे ते म्हणाले. धर्मवीर संभाजीराजे चौक स्मारक सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी प्रास्तविक केले.

या प्रसंगी श्रीनाथ पवार, प्रमोद कग्राळकर, निशांत कुडे, श्रवण जुटे, मंथन कामुले, सुमित पाटील, प्रसाद पवार, ऋषभ मोहिते, निखिल पाटील, महेश सोनदी, प्रथमेश किल्लेकर, ओंकार मोहिते, आकाश कुकडोळकर प्रसाद मोरे, ओमकार पुजारी, कुंज नावगेकर, ओमकार भोसले, युवराज भोसले, सुशांत तारिहाळकर, वैभव तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण समितीचे सर्व सदस्य, महिला भगिनी, युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments