Belagavi

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बेळगाव जिल्हा विभाजनाची मागणी

Share

राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगावचे क्षेत्रफळ तीन जिल्ह्यांइतके मोठे आहे. जिल्ह्याचे प्रशासकीयदृष्ट्या विभाजन करावे ही गेल्या तीन दशकांपासूनची मागणी आहे. मात्र, इच्छाशक्तीचा अभाव आणि राजकारण्यांचे वेगवेगळे सूर यामुळे ते स्वप्न स्वप्नच राहिले आहे. आता आमदार लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्याने या विषयाला पुन्हा तोंड फुटले आहे.

 

बेळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ 13415 चौरस किमी असून, लोकसंख्या 50 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यात 18 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात 15 तालुके, 6 आरटीओ कार्यालये, 506 ग्रामपंचायती, 345 तालुका पंचायत सदस्य, 90 ग्राम पंचायत सदस्य आहेत. बेळगाव, गोकाक, हुक्केरी, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग, अथणी, चिक्कोडी, रायबाग, खानापूर, कित्तूर, कागवाड, निप्पाणी आणि मुडलगी हे 14 तालुके बेळगाव जिल्ह्यात आहेत. फ्लो
बेळगाव जिल्ह्याचे विभाजन : तीन दशकांचा संघर्ष :

सीमावर्ती भागातील चिक्कोडी उपविभागातील अनेक गावांतील लोकांना कामासाठी 200 किलोमीटरहून अधिक प्रवास करून बेळगावात जावे लागते. रोजचे काम सोडून त्यासाठी अख्खा दिवस घालवावा लागतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासकीय दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे. मात्र, जिल्हा विभाजनाचा वाद केवळ निवडणुका आणि हिवाळी अधिवेशनातच चव्हाट्यावर येतो. त्यानंतर कोणीही राजकारणी यावर काही बोलत नाही.
आपल्या पक्षाची सत्ता येताच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याचे चिक्कोडी, गोकाक जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्याची विधाने अनेकदा केली आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या आमदारांची बैठकही झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर जिल्हा पालकमंत्र्यांच्या बाजूने आणि विरोधातही चर्चा रंगल्या. बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी, आम्ही त्या बैठकीला गेलोच नाही असे सांगत, जिल्ह्याचे विभाजन करायचेच असल्यास आमच्या बैलहोंगलचा विचार करावा, अशी मागणी केली होती.

दरम्यान, अथणी जिल्हा करण्याचा सूर माजी उपमुख्यमंत्री व अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी लावला आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी, रायबाग, कागवाड, कुडची हे तालुके आणि बागलकोट जिल्ह्यातील तेरदाळ आणि जमखंडी तालुके एकत्र करून अथणी जिल्ह्याची निर्मिती करावी. त्यानंतर या भागातील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघेल, असे सांगून या सहा मतदारसंघातील आमदारांनी अधिवेशनात आपले मत मांडावे, असे आवाहन आमदार लक्ष्मण सवदी यांनी केले आहे. बाईट
अंतर्गत राजकीय कलहामुळे जिल्हा विभाजनाला उशीर

बेळगाव जिल्हा आपल्या ताब्यात ठेवलेल्या जारकीहोळी, सवदी, कत्ती, कोरे, जोल्ले कुटुंबांतील अंतर्गत कलहामुळे जिल्ह्याचे विभाजन होत नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक आमदारांनी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे, यासाठी काँग्रेस सरकारवर दबाव आणला होता.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत मुख्यमंत्री व शासन योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील. तोपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले आहे.

दुसरीकडे बेळगावचा सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत जिल्हा विभाजन करू नये, अशी मागणी कन्नड कार्यकर्ते सरकारकडे करत आहेत.

एकंदरीत, या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या बेळगाव हिवाळी अधिवेशनात जिल्हा विभाजनावर सर्वसहमतीने आमदार आवाज उठवतील का याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tags: