Belagavi

तारिहाळमध्ये भाजप ग्रामीण मंडळतर्फे ‘माझी माती माझा देश’

Share

बेळगाव तालुक्यातील तारिहाळ गावच्या श्री. सिद्धेश्वर मठाच्या प्रांगणात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

दिल्ली येथील कर्तव्यपथजवळ युद्ध स्मारकाच्या बाजूला भव्य अमृतवाटिका निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी भाजपतर्फे ‘माझी माती माझा देश’ हे अभियान राबवून देशातील लाखो गावातून पवित्र, मंदिराजवळून, महापुरुषांच्या पावन भूमीतून, तीर्थक्षेत्रातून पवित्र माती नियोजित अमृतवाटिकेसाठी पाठविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने तारीहाळ येथील श्री सिद्धेश्वर मठाच्या आवरणामध्ये या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. या निमित्ताने पाच अमृत कलशांचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले की, देशाच्या प्रगतीमध्ये नवनव्या प्रकल्पामध्ये जनतेला सामावून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रयत्न करत असतात, मोदींच्या नेतृत्वाखाली देश अतिशय वेगाने प्रगती करत आहे अमृतवाटीका निर्माण मध्ये प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजेत की आमच्या गावातून सुद्धा पवित्र माती पाठविण्यात आली आहे, फक्त निवडणूक आली तरच जनतेसमोर जाऊन थांबणारे पक्ष वेगळे आहेत पण 12 ही महिने कार्यरत राहणारा कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, आम्ही सर्वजण मिळून राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला हातभार लावूया असे ते म्हणाले.

याप्रसंगी भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, 2013-14 मध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांची गुजरात येथे भव्य मूर्ती निर्माण कार्यासाठी देशातील करोडो शेतकऱ्यांच्याकडून शेतीसाठी उपयोगात आणली जाणारी अवजारे लोह संग्रह करून एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानांतर्गत गुजरात येथे पाठवण्यात आले होते आणि आज सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती जगात सर्वात उंच असून जगातील पर्यटकांचे ते आकर्षणाचे केंद्र बनले आहे तसेच अमृत वाटिका सुद्धा देशातील लाखो गावातून पवित्र माती एकत्र करून दिल्ली येथे पाठवली जाईल आणि ही वाटिका सुद्धा पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भेटी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी बेळगावच्या खासदार मंगल अंगडी, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनीही विचार मांडले. या कार्यक्रमांमध्ये 2047 पर्यंत देशाला सुपर पावर बनवण्याची व राष्ट्र हितासाठी काम करण्याची शपथ घेण्यात आली. या ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले. याप्रसंगी भाजप बेळगाव विभाग संघटना सहप्रधान कार्यदर्शी जयप्रकाश, भाजप ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव,

माजी तालुका पंचायत अध्यक्ष गजानन नाईक, माजी तालुका पंचायत सदस्य लक्ष्मी मास्तमर्डी, पुंडलिक अण्णाप्पा नाईक, सिद्धया आडव्याप्पानमठ, ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष लिंगराज हिरेमठ, महाशक्ती केंद्रप्रमुख भुजंग सालगुडे, सिद्धाप्पा हुक्केरी, भरमा गोम्मनाचे, मल्लिकार्जुन मादन्नावर, एस सी मोर्चा अध्यक्ष यल्लेश कोलकार, ग्रामीण मंडळ सरचिटणीस पंकज घाडी, निलजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश शहापूरकर आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: