Belagavi

बेळगावात लिंगायत संघटनेतर्फे शिक्षकदिन

Share

गुरूची सेवा ही शाश्वत असते आणि गुरु-शिष्याचे नाते हे महत्वाचे, सर्व नात्यांच्या पलीकडचे असते असे शिक्षिका सुमित्रा करविनकोप्प यांनी सांगितले. लिंगायत संघटनेच्या वतीने आज रविवारी बेळगावातील फ. गु. हलकट्टी भवन येथे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात काकती सरकारी हायस्कूलच्या शिक्षिका सुमित्रा करविनकोप्प यांचे ‘गुरू आणि शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंधाचे महत्त्व’ या विषयावर विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,

अलेक्झांडर, एकलव्य, स्वामी विवेकानंद, चंद्रगुप्त मौर्य यांसारखी महान व्यक्तिमत्त्वे सॉक्रेटिस ऍरिस्टॉटल, आचार्य द्रोण, रामकृष्ण परमहंस, चाणक्य इत्यादी महान गुरुंच्या दैवी शक्तीमुळे प्रकाशात आली. त्या गुरू शिष्यांचे ते गाढ नाते, विद्येची आवड, गुरूंवरील भक्ती खरोखरच अनोखी होती. त्या नात्याबरोबरच गुरूचे महत्त्व अधोरेखित करून पुढे जायचे आहे. शिक्षणपद्धती बदलत असली तरी आपले अस्तित्व न गमावता गुरूची जबाबदारी वाढत आहे. त्या संदर्भात, भूतकाळातील इतिहास आताही आपल्यासाठी आदर्श राहिला पाहिजे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना, लिंगायत संघटनेचे अध्यक्ष इरण्णा दयेन्नवर यांनी सांगितले की, धर्म, संस्कृती, चालीरीती, विचार आणि कृती यांच्या पुरेशा अंमलबजावणीसाठी गुरु हेच स्त्रोत आहेत. गुरु हा सामाजिक जबाबदारीचा महत्त्वाचा दुवा आहे असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा पुरस्कार विजेत्या शिक्षिका माला बुळ्या म्हणाल्या की, या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी वाढली असून त्यादृष्टीने आम्ही या पवित्र व्यवसायाची जबाबदारी यापुढेही चोखपणे पार पाडू आणि पुढे जाऊ.

यावेळी जिल्हा पुरस्कार विजेत्या शिक्षिका माला बुळ्या, गीता गानिगेर, सेवानिवृत्त शिक्षक डी. एस. पुजार, शोभा पाश्चापूर, बी. बी. कमते, एम. वाय. मेनसिनकायी, रामू गुग्गवाड, रमेश गोणी, प्रकाश दयेण्णावर आदींचा लिंगायत संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

रामू गुग्गवाड यांनी शिक्षणातील संस्कृतीचा अभाव असल्याचे सांगून याबाबत योग्य ती पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आनंद कर्की, व्ही. के. पाटील, शंकर गुडस, शिक्षिका डॉ. दानम्मा झळकी, गीता तिगडी, कमला गणाचारी, शांतम्मा तिगडी, अक्कमहादेवी तेगी आदी उपस्थित होते. सुरुवातीला महादेवी अरळी यांनी वचन प्रार्थना सादर केली. शिवानंद तल्लुर यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. संगमेश अरळी यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: