Belagavi

भाजप ना कधी स्वबळावर कर्नाटकात सत्तेत आलाय, अन ना कधी येईल : एच. विश्वनाथ

Share

भारतीय जनता पक्ष ना कधी स्वबळावर कर्नाटकात सत्तेवर आलाय, अन ना कधी येईल असे सांगत विधानपरिषद सदस्य एच. विश्वनाथ यांनी स्वपक्षावरच टीकेची झोड उठवली.
बेळगावात संगोळ्ळी रायण्णा महाविद्यालयाच्या प्रांगणात संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात भाग घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. विश्वनाथ पुढे म्हणाले की, भाजप कर्नाटकात कधीही स्वबळावर सत्तेवर आलेला नाहीय आणि भविष्यातही कधी येणार नाही. एकदा ते कुमारस्वामींच्या खांद्यावर बसून सत्तेत आले अन दुसऱ्यांदा आमच्या खांद्यावर बसून. केंद्रात गेली ९ वर्षे भाजपचे सरकार आहे. या वर्षांत त्यांनी कर्नाटकाला, राजधानी बेंगळूरला काय दिले? नवरत्ने असलेल्या रोजगार निर्मिती करणाऱ्या सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण त्यांनी केले असा आरोप त्यांनी केला. केवळ राजकीय हेतूने अन्नभाग्यसाठी केंद्रसरकार तांदूळ देण्यास नकार देत असल्याच्या आरोपावर त्यांनी सहमती दर्शवली. अन्नाच्या बाबतीत राजकारण करू नये. पण काँग्रेस सरकारचे नाव खराब व्हावे, लोकांमध्ये अपप्रचार व्हावा यासाठी केंद्र कर्नाटकाला तांदूळ देत नाहीय. तांदळाऐवजी पैसे देण्याच्या सरकारच्या विचारला लोक विरोध करत नाहीयेत, तर कोणीतरी त्यांना विरोध करायला चिथावणी देत आहेत असा आरोप त्यांनी केला. पॉट भरणाऱ्या अन्नाच्या बाबतीत, शिक्षण देणाऱ्या शाळांच्या बाबतीत राजकारण करू नये असे मला वाटते. देवराज अर्स यांनी आम्हाला तसे शिकवले. सात लाख टन तांदूळ गोदामात पडून आहेत, अन यांना राजकारण सुचते. मोफत बसप्रवास योजनेमुळे गरीब महिलांना प्रवासाची, देवदर्शनाची संधी मिळाली यात काय चुकले असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसमधून आलेल्या आमदारांमुळे भाजपमध्ये बेशिस्त आली या के एस ईश्वरप्पा यांच्या विधानाचा समाचार घेताना ते के एस ईश्वरप्पा नाहीत तर एच एम ईश्वरप्पा आहेत असा टोला एच विश्वनाथ यांनी लगावला.

Tags: