येळ्ळूर ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांना चालना देण्याच्या संदर्भात येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन पालक मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची त्यांच्या जिल्हा कार्यालयात भेट घेऊन निवेदन देण्यात आले.


येळ्ळूर ग्रामपंचायत हद्दीत गायरान जागा, जलजीवन मिशन योजना आणि केइबी संदर्भात तसेच गावांतील रस्ते, गटारी आणि इतर विकास कामांमध्ये लक्ष घालुन त्यांना चालना देण्याची विनंती ग्रामपंचायतीच्या वतीने मंत्री जारकीहोळी यांना करण्यात आली. येळ्ळूरमधील सर्वे नंबर 1142 मधील 49 एकर 13 गुंठे जागा गायरान म्हणून नोंद आहे. गावची लोकसंख्या 25 हजार आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे येळ्ळूर गावाला लाभलेली ही 49 एकर 13 गुंठे जागेपैकी 40 एकर गायरानाची जागा जर आंतरराष्ट्रीय क्रीडांगणासाठी गेली तर याचा फटका संपूर्ण शेतकरी वर्गाला बसणार आहे. त्याशिवाय भविष्यात ग्रामपंचायतीच्या नवीन उपाययोजना आणि स्कीम्सची पूर्तता करण्यासाठी गावाकडे जागाच शिल्लक राहणार नाही. त्याचबरोबर जनावरे चारण्यासाठी गायरान अतिशय महत्त्वाचे आहे. येळ्ळूरमधून रिंगरोड करण्याचा घाट तर सरकारने घातलाच आहे त्यात भर म्हणून हे आंतरराष्ट्रीय क्रीडांगण करण्याचा विचार आहे. याने विकासाच्या नावाखाली गावातील पिकाऊ जमीन व गायरान नष्ट होणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत काही घरे, गावातली हरीमंदीर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य टाक्या यांचा समावेश असल्याने या सर्व गोष्टी सुध्दा गावाला गमवाव्या लागणार आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून ग्रामपंचायतीने सर्वानुमते ठराव करून याला विरोध देखील केला होता. पण यावर कोणतीच भूमिका घेतली गेली नाही असे निवेदनात नमूद केले आहे.
येळ्ळूरसाठी सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेचे काम गेली दोन वर्ष सुरू आहे. सुमारे 5 कोटीची ही योजना सबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अयशस्वी होण्याची शक्यता आहे. चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन घालणे, नळाची जोडणी करताना कोणतेच नियोजन नसणे, फिल्टर प्लांटमध्ये पाण्याचे शुद्धीकरण योग्य प्रकारे न होणे, पाण्याच्या टाकीचे वॉटर प्रूफिंग योग्य नसणे, पाण्याचे प्रेशर कमी असणे काही ठिकाणी पाईपला गळती असणे, तर काही ठिकाणी पाइपलाइन गटारीवर बसवल्या आहेत. तसेच अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी पाईप लाईन जोडणीचे काम पूर्णच झालेले नाही, ही समस्या सोडविण्याची विनंती केली आहे.
हेस्कॉम संदर्भातही निवेदनात तक्रार केली आहे. जुने, खराब खांब व टीसी बदलणे, काही ठिकाणी घरावरून विद्युत तारा गेल्या आहेत याने जीवित हानी होऊ शकते तर याची दखल घेऊन या संदर्भात उचलण्यासाठी सबंधित अधिकाऱ्याना वारंवार ग्रामपंचायत मार्फत निवेदन देऊन देखील यावर दुर्लक्ष करण्यात आले आहे.. तसेच गावांतील रस्ते, गटारी आणि इतर विकास कामांमध्ये लक्ष घालुन ती त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे.
यासाठी पालक मंत्री आणि सार्वजानिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सहकार्य करावे अशा विनंतीचे निवेदन येळ्ळूर ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले. यावेळी आपण स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालून यावर तोडगा काढू असे आश्वासन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशराम परीट, राकेश परीट, दयानंद उघाडे, ज्योतिबा चौगुले, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अनुसया परीट, रूपा पुण्ण्यानावर, मनीषा घाडी, राजू डोण्ण्यान्नवर, सोनाली येळ्ळूरकर, लक्ष्मण छत्र्याण्णावर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments